Sunday, 7 March 2021

भूत-भुताटकी-चकवा

*भूत-भुताटकी-चकवा*

गावात भूत भताटकीच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. काहींचा प्रत्यय आपणाला आजही येतो...
अस म्हणतात या भुता खेतांच्या गोष्टींची सत्यता आपण शक्यतो तपासून पाहू नये !!!

तर मी ही ऐकलेली ही गोष्ट ....

मंडळी ही गोष्ट ज्यावेळी फक्त बैलगाडीने राजापूरहून दुकानाचा माल आणला जात होता त्याकाळातील आहे .(साधारणपणे 100 -१५0 वर्षापर्वीची)
राजापूरहून माल घेऊन संध्याकाळी निघालेल्या बैलगाड्या सकाळी पाचल , तळवड्याला पोचायच्या , जर वाटेत काही अडचण आली नाही तर ...
अजूनही आपण पाहू शकतो सौंदळ पासून राजापूरला जायचा बैलगाडीसाठीचा रस्ता वेगळा आहे. सध्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने हा रस्ता जातो.

इथे एक शंकराचं देऊळ ही आहे .सौंदळ तस मुस्लिम वस्तीच गाव असलं तरी सुद्धा शंकराचं मंदिर पूर्वी पासून आहे .

राजापूरहून माल घेऊन निघालेल्या बैलगाड्यांना नदीच पात्र पार करून , मोठा चढाव चढून वर यावं लागायचं . चढ चढून मालाने भरलेली गाडी, पहिल्या फटक्यात (प्रयत्नात ) जो गाडीवान वर आणेल तो खरा गाडीवान अस मानलं जायचं त्याकाळी ....

त्याला कारणही तशीच होती ....

एकतर राजापुरपासून भरलेली गाडी इथे येईपर्यंत बैल थकून जायचे , आणि रात्रीचे 1 , 2 वाजायचे . डोळ्यात बोट घातल तरी समजणार नाही असं मिट्ट काळोख असायचा. नदीच्या पात्रातून वरती चढण्याचा चढवाचेच चार रस्ते होते, एक रस्त्यावरुन थोडं मागे जायचं व एक वळण घेतलं की आपला पाचल तळवड्याचा  रस्ता दिसायचा , दुसरा रस्ता तुम्ही पकडलात व वर आलात की तुमच्या लकशात यायचं तुमचा रस्ता चुकलाय व तुम्ही उलट बाजूला आलाय, आणखी एक रस्ता सौंदळ गावात जायचा आणि चौथा आणि शेवटचा तुळसवडे ह्या गावात जायचा .

नदीचं पात्र पार झालं की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी एक प्रथा होती त्याकाळी .....

गाडीवानाने इथे पोचल्यावर गाडीतून उतरायचं आणि कुकारा (हाक) मारायचा व
" गाड़ी वर येऊ दे काय ?" अस विचारायचं !!

त्या भयाण रात्री सुद्धा आपण मारलेल्या कुकाऱ्याला उत्तर म्हणून दुसरा कुकारा ऐकू यायचा..

मंडळी , प्रथेप्रमाणे जर तूम्ही साद दिली नाही आणि प्रतिसाद येण्यापूर्वीच पुढे आलात तर ...

भाद्रपद महिना होता आणि आमची गाडी राजापूरहून माल भरून निघाली होती.गाडीत भाऊ आणि गाडीवान तुकाराम हातणकर होते. 
कधी नाही तो तुकारामांचा डोळा लागला .....
आणि नेहमीच्या सवइ प्रमाणे बैलांनी घरचा रस्ता बरोबर पकडला . गाडी नदीतून वर आली आणि अर्ध्या रस्त्यात बैल उभे राहिले आणि पुढे जाईनात....

तुकारामाने हर प्रयत्न केले पण बैल जागा सोडेंनात....
शेवटी तो गाडीतून खाली उतरला आणि दहा पावलं चालत पुढे गेला आणि  ......  
त्याला दरदरून घाम फुटला....
धावत धावत येऊन त्याने भाऊंना उठवलं , पण पुढे काही त्याच्या तोंडून नीट शब्दच येईनात....

भाऊंना काय झालं याची थोडीफार कल्पना आली होती ....

भाऊंनी तुकारामाला

 "गाडी मी परत येईपर्यंत इथून हलवू नकोस आणि काही झालं तरी तू गाडीतून खाली उतरू नकोस " अस सांगितलं
आणि त्याही परिस्थितीत त्यांनी त्या देवळाचा रस्ता धरला ... 

दुसऱ्या दिवशी घरी अनंताची पूजा होती व भाऊ पूजेला बसणार होते.

भाऊ शंकराच्या देवळात आले , नमस्कार केला , 
" उद्या अनंताची पूजा आहे , चूक -भूल पदरात घे , आणि गाडीला रस्ता दाखव " 
अस सांगून नमस्कार केला ...

आणि देवळातून बाहेर पडले  मात्र .....

देवळाच्या मागच्या बाजूनं डोक्यावर घोंगडी घेतलेला  एक रांगडा गडी जाताना म्हणाला .....

" पूजा हाय म्हणून तूला आज सोडलंय...... 
मला साद (हाक) का नाय दिली....
जा आता गुमान......"

ती बघ गाडी आणलीय मी वर ....

आश्चर्य म्हणजे खरोखरच गाडी देवळा समोर उभी होती ....

आणि तुकाराम 

"लय येळ (वेळ) लाऊ नका शेट...  येळत जया हवं "
असं भाऊंनाच सांगत होता ...."

मंडळी रस्त्यात तुकारामाने अस काय पाहिलं ....

नंतर हे लोक घरी आले , पूजा झाली ..

दोन तीन दिवसांनी तुकारामाला राजापूरहून येताना त्या दिवशी काय झालं होत म्हणून विचारलं तर....

दोन दिवसांपूर्वी रस्त्यात गाडी अडली होती , त्याने भाऊंना उठवलं होतं.
इथपर्यंत त्याला सांगता येत होतं .... 

नंतर एकदम ....

"शेट रातच्या वक्ताला कालोखातून देवलात कशापायी गेले , अन आले हे बरी माझ्या   धेनात आजूनबी नाय आलं ....."
असं तो म्हणत होता ...
   
काय झालं होतं तर गाडीतून खाली उतरल्यावर रस्त्यात मधोमध दोन चुली पेटलेल्या व बाजूला घोंगडी पांघरून हातात एक मोठी काठी घेऊन बसलेली एक माणसासरखीच विचित्र अशी आकृती  त्यानं पहिली होती ......
रात्रीची वेळ असल्यामुळे तो घाबरला होता ....भीती वाटण्यासारखच ते सगळं होतं ....

नंतर भाऊनीही ते सर्व  बघितल .....
थोडं त्यांच्याही मनात चर्रर्रर्र झालं ...
पण थोडा धीर दाखवून त्यानी देवळात जायचा निर्णय घेतला होता ...


तर अशीही भुताटकी , चकवा... 
याचा अनुभव ज्यांना येतो त्या काही जणांनाच त्या विषयी नंतर सांगता येत.
खूप जण तंद्रीतच सर्व करतात जे त्यांना नंतर सांगताच येत नाही...

तळवड्याला आमच्या घरी , जवळच असलेल्या तेलंब्यावरच भूत , त्याच लसणीच तिखट व तेलासाठी मृग नक्षत्राच्या सुरवातीला रडणं , मांडवकराचा फणस (त्याने लावलेलं फणसाचा झाड )
या सर्वांची घरात काही विशेष असेल तर  आजही आठवण ठेवावी लागते  , करावी लागते केली जाते.... 

वीसरलात तर .....


याविषयी पुन्हा कधितरी ....


अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
07 मार्च 2021